नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून तातडीने मदत द्यावी…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून तातडीने मदत द्यावी -संभाजी दहातोंडे
नेवासा प्रतिनिधी -(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
नगर जिल्ह्यासह राज्यातील बहूतांश भागात गेल्या दोन दिवसापासून जोरदार गारपीट व वादळी पावसाने शेतपिकांचे, घरांचे व अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सलग पंधरा दिवसात दुसऱ्यांदा शेतकऱ्यावर संकट आले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत करावी आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.
राज्यातील शेतकरी गेल्या वर्षभरात सातत्याने संकटात आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना अजूनही त्याची मददत मिळाली नाही. पंधरा दिवसापुर्वी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटी मुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचीही अजून भऱपाई देण्याबाबत काहीच हालचाल नाही.त्यात आता दोन दिवसापासून सतत गारपीट, वादळी पाऊस, पडत आहे. त्याचा फळपिकांना मोठा बसला असून एन बरहात आसलेल्या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. बहूतांश भागात कांदा पिक चांगल्या स्थितीत असताना कांद्याचे नुकसान झाले आहे. आधीच भाजीपाल्याला दर नाही. त्यात या पावसाने व गारपीटीने भाजीपाल्याचे वाताहात केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घराचे, गोठ्याचे नुकसान झाले आहे. एक तर शेतकरी संकटात असताना सरकारची मदतीची भूमिका दिसेना, केवळ आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी एवढेच वारंवार सांगितले जात आहे. सततचा पाऊस, गारपीट, वादळ व होणारे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज अससल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. दहातोडे यांनी काल नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.